गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्लीपासून अवघ्या सात किलोमीटरवरील जवेली या गावाने ग्रामसंघाच्या माध्यमातून दर शनिवारी स्वयंस्फुतीने गाव स्वच्छ करण्याचा पायंडा पाडला आहे.
जवेली हे ४५० लोकवस्तीचे गाव आहे. १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या गुरुपल्ली ग्रामपंचायतीतंर्गत हे गाव येते. सप्टेंबर २०१३ मध्ये या गावांत जय हनुमान स्वयंसहायता गटाची स्थापना करण्यात आली. या गटातील शोभा अरका आणि रुखमा उसेंडी या महिलांना आंध्र प्रदेशातील वरंगल येथे अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती म्हणून सात दिवसांचे प्रशक्षण घेण्याची संधी मिळाली. स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून कोणकोणते सामाजिक कार्य केले जाऊ शकते, याची त्यांना प्रशक्षणातून माहिती मिळाली. या माहितीमुळे उत्साहित झालेल्या शोभा आणि रुखमाने आपल्या स्वयंसहायता गटाच्या बैठकांत ऑक्टोंबर २०१३ मध्ये सामाजिक कार्याचा विचार मांडला. या बैठकीत गावांत नियमितपणे स्वच्छता करण्याचे ठरविण्यात आले. महिन्यातून तीन शनिवारी स्वच्छता करण्याचे ठरविण्यात आले. सुरवातीच्या दोन शनिवारी केवळ पाच ते सात महिला सदस्य स्वच्छता करण्यास यायच्या. याचदरम्यान या गावांत स्वयंसहायता गटांनी एकत्र येत जय हनुमान महिला ग्रामसंघ स्थापन केला. त्यात स्वच्छतेच्या विषयावर चर्चा झाली. त्यामुळे स्वच्छता करण्यासाठी दर शनिवारी ६० हून अधिक महिला स्वत:हून येण्यास सुरवात झाली.
मागील वर्षीपासून हा उपक्रम अविरत सुरू आहे. रस्ते स्वच्छ करणे, उन्हाऴयात ग्रामपंचायत तसेच शाळेने लावलेल्या झाडांना पाणी देणे, मंदिराचा परिसर स्वच्छ करणे अशी कामे नित्याची झाली आहेत. महिलांचा हा उत्साह बघून पुरुष मंडळींनी यात सहभागी व्हायची इच्छा प्रकट केली. मात्र, महिलांनी त्यास नकार दिला. जुलै ते ऑगस्ट या हंगामाच्या दिवसांत वेळ मिळत नसल्याने सर्वसंमतीने दोन महिने उपक्रम बंद ठेवला जातो.
0 प्रतिक्रिया:
Post a Comment